कृषी अधिकाऱ्याच्या अफलातून फतव्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यात वादाची ठिणगी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : कोणतेही पत्र कार्यालय प्रमुखाच्या निदर्शनास आणल्याशिवाय घेवू नये असा नियमबाह्य व अफलातून फतवा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मागच्या महिण्यात काढला. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी अर्ज किंवा तक्रार घेण्यास नकार देत असल्याने तक्रारदार आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यात सतत वाद होत असल्याने कर्मचारी वैतागले आहेत तर तक्रारदार या प्रकाराचा तिव्र शब्दात संताप व्यक्त करत आहेत.
नायगाव तालुका कृषी कार्यालयाचा प्रभारी कारभार मागच्या दोन वर्षापासून सुनील वरपडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पण ते विविध कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. विशेषतः त्यांची कार्यालयात कमी व बाहेरच जास्त असतात. त्यामुळे कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या मागच्या वर्षी पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली असतांना वरपडे हे बाहेरच आहेत.
नायगाव तालुका कृषी कार्यालय हे नेहमीच वादग्रस्त ठरत आलेले असून यावेळी तालुका कृषी अधिकारी सुनील वरपडे यांनी दि. 15 जुलै रोजी काढलेल्या पत्रामुळे वाद वाढत चालला आहे. सुचनांचे पालन करण्यासाठी काढलेल्या पत्रात कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुचना करण्यात आल्या आहेत त्यातील मुद्दा क्रमांक 3 नुसार कार्यालयात आलेले कोणतेही पत्र कार्यालय प्रमुखाच्या निदर्शनास आणल्याखेरीज व संबधीत शाखेचे कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या रिमार्क शिवाय इनवर्ड करण्यात येवू नये असे आदेश काढले आहेत.
वरपडे यांनी काढलेल्या या नियमबाह्य व अफलातून फतव्यामुळे कर्मचारी कुणाचीही तक्रार किंवा अर्ज घेण्यास स्पष्ट नकार देत असून अर्ज न घेण्याबाबत साहेबांचेच आदेश असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अर्ज घेवून येणारे किंवा तक्रारदारात अर्ज किंवा तक्रार घेण्यावरुन वाद वाढत चालले आहेत.
दिवसातून अनेकवेळा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याने कर्मचारी अक्षरशः वैतागले आहेत तर दुसरीकडे अर्ज घेवून येणारे किंवा तक्रारदार संताप व्यक्त करुन तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कुळाचा उध्दार करत आहेत. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या या नियमबाह्य पत्राची वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
काढलेल्या सुचना पत्राचे समर्थन करतांना तालुका कृषी अधिकारी सुनील वरपडे यांनी कार्यालयात चारच कर्मचारी आहेत त्यामुळे चालढकल करुन काम करावे लागत आहे. शेतकरी व लाभार्थ्यांची गर्दी होत असल्याने ताण वाढत आहे असे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.