गोदावरी मनार कारखाना राखण्यासाठी दरमहा नांदेड जिल्हाबँकेचा लाखो रुपये वायफळ खर्च

मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना अवसायनात निघून अनेक वर्षे लोटली असून शासनाने जप्त केलेल्या हा कारखाना नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात असल्याने हा कारखाना राखण्यासाठी जिल्हा बँकेला दरमहा लाखो रुपये वायफळ खर्च करावा लागत असल्याने बुडत्याचा पाय खोलात म्हटल्याप्रमाणे जिल्हा बँकेची अवस्था झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्यावर करोडो रुपये कर्ज झाल्याने हा कारखाना बंद पडला असताना हा कारखाना 2006 मध्ये मुंबई येथील डॉलेक्स या खाजगी कंपनीला भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्यातही आला होता मात्र तोही दोन वर्षाच्या आतच कारखाना सोडून निघून गेल्याने हा कारखाना सुमारे पंधरा वर्षांपासून बंद पडला असल्यामुळे या कारखान्या वरील टिनपत्रे फुटुन कित्येक वर्षापासून पावसाच्या पाण्यात कारखान्याची महागडी मशनरी भिजून कुजली जात आहे.
सुमारे पंधरा वर्षांपासून बंद पडलेला गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना राखण्यासाठी जिल्हा बँकेकडून एक सुपरवायझर आणि चवदा सुरक्षा गार्ड ठेवले असल्याने यांचा दरमहा एक लाखापेक्षा जास्त पगार जिल्हा बँकेला नाहक द्यावा लागत आहे.अधिच जिल्हा बँकेनी कारखान्यास दिलेले करोडो रुपये बाकी असताना बंद पडलेला कारखाना राखण्यासाठी जिल्हा बँकेकडून दरमहा लाखो रुपये सुमारे पंधरा वर्षांपासून वायफळ खर्च केला जात असल्याने आज पर्यंत कारखाना राखण्यासाठी करोडो रुपये जिल्हा बँकेला खर्च करावे लागत आहे.
गोदावरी मनात सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर हेच आता जिल्हा बँकेचे अध्यक्ष असल्याने कारखान्याची योग्य विल्हेवाट लावून जिल्हा बँकही वाचवण्यासाठी दादांनी मनावर घेतले तर कारखाना व बँकेस पुना वैभवाचे चांगले दिवस येऊ शकतात असा आशावाद आजही अनेकांना आहे.