मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेचे दागिने पळवले : दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने एकच खळबळ

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : शहरातील श्रीनगर भागातील कँनाल रोडवर रविवारी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील दागीने हिसकावून पळ काढल्याची खळबळजनक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. चक्क दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने महिलात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध लागणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नायगाव शहर व परिसरात अवैध धंद्याने बाळसे धरु लागल्यामुळे गुन्हेगारीतही वाढ होवू लागली आहे. काही महिण्यापुर्वी शहरातील एका व्यापाऱ्यांचे जवळपास तीन लाख रुपये चोरट्यांनी धुम स्टाईलने चोरी करु पळ काढला होता. या घटनेचा आजपर्यंत नायगाव पोलिसांना तपास लावता आला नाही हे विशेष.
दुसरीकडे नायगाव पोलीस ठाण्याला अतिशय निष्क्रिय पोलीस अधिकारी लाभल्यामुळे कुणाचा पायपोस कुणाला राहीला नाही. त्यामुळे नायगाव शहरात अनेक कारणामे घडत आहेत. विशेष म्हणजे नांदेड शहरातील काँफी शाँपमध्ये चालणारे उद्योग आता नायगाव शहरातही सुरु झाले आहेत पण पोलीस यंत्रणा बघ्याची भुमिका घेत आहे.
नायगाव पोलीसांची यंत्रणा विविध धंद्यातून वसूली करण्याच्या कामाला लागल्याने शहरात अनेक धंदे अलबेलपणे सुरु आहेत. यातूनच चोरी व वाटमारी यासारख्या गंभीर घटना घडत आहे. रविवारी सकाळी 30 ते 35 वर्षाची महिला स्वामी समर्थाचे दर्शन घेवून कँनाल रोडने घराकडे जात असताना श्रीनगरच्या जवळ पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागीने हिसकावले. यात सदरची महिला खाली पडली पण या चोरट्यांनी खाली पडल्यानंतरही महिलेच्या गळ्यातील दागिने घेवून पसार झाले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर नायगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेले आणि काही धागेदोरे सापडतील काय याची चाचपणी केली पण मोटारसायकलवरुन आलेल्या चोरटे कोणत्या मार्गे आले आणि कोणत्या मार्गाने गेले याचे कुठलेच धागेदोरे सापडले नाहीत. या प्रकरणी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कसलाही गुन्हा नोंद करण्यात आला नसला तरी रविवारी सकाळी 11.30 घडलेल्या या घटनेने शहरात तर खळबळ उडालीच पण महिलामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यामुळे गुन्हेगारावर तर वचक राहीलाच नाही पण शहरातही मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाढली आहे.