उन्हाळी हंगामासाठी बाभळी बंधाऱ्यातील पाणीसाठा ‘जैसे थे’ ठेवा : खासदार रवींद्र चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : धर्माबाद तालूक्यातील बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये सध्या पाणी साठा भरपूर असून दूरूस्तीच्या नावाखाली पाणी साठा कमी करण्याचा निर्णय संबंधीत विभाग घेत असल्याची माहिती आहे. बंधारा परिसरातील शेती पिकांचा विचार करता हा पाणीसाठा कमी न करण्याची मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
संबंधित विभागाकडून बाभळी बंधाऱ्यातील पाणी साठा कमी करण्याचा विचार होत असल्याची माहिती मिळताच खासदार रवींद्र चव्हाण यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यांनी निवेदनात नमूद केले की, धर्माबाद तालूक्यातील बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये सध्या पाणी साठा भरपूर असून दूरूस्तीच्या नावाखाली पाणी साठा कमी करण्याचा विचार संबंधीत विभाग करीत असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
या बंधाऱ्याच्या बॅक वॉटर अंतर्गत एकूण 30 ते 35 गावे दोन्ही बाजूने वसलेली आहेत. या गावा अंतर्गत हजारो एकर जमीनीमध्ये सध्या ऊस, केळी, भाजीपाला अशा प्रकारची पिके घेतलेली आहेत. सदरील पाणी साठा कमी झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागेल.
शेकडो शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन बंधाऱ्यातील पाणी साठा कमी न होऊ देता उन्हाळी हंगामासाठी संबंधीत शेतीसाठी पाणीसाठा जैसे थे ठेवण्यात यावा, अशा सूचना जलसंपदा विभागाला द्याव्यात अशी ही मागणी खासदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.