लाचखोर तलाठी अशोक गिरी ACB च्या जाळ्यात : दहा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : वडीलोपार्जीत जमिनीचे फेरफार करण्यासाठी २० हजाराची लाच मागून १० हजारावर तडजोड केल्यानंतर चक्क शासकीय पंचासमक्ष दहा हजार रुपये घेताना कुष्णूर सज्जाचे तलाठी अशोक दिगांबर गिरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून. नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार शुभम संभाजी जाधव नायगाव तालुक्यातील कुष्णूर येथील असून त्यांची गट क्रमांक ११६,१४६ व ४०७ मध्ये २ हेक्टर २१ आर जमीन आहे. सदरची जमीन वारसा हक्काने सातबारावर घेण्यासाठी कुष्णूर सज्जाचे तलाठी अशोक गिरी यांचेकडे अर्ज केला पण त्यांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही व नंतर वारसा हक्काने फेरफार करण्यासाठी २० हजाराची मागणी केली. त्यामुळे अर्जदार जाधव यांनी संताप व्यक्त तर केलाच पण थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. तलाठी गिरी यांनी गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याचे दरम्यान तहसील कार्यालयाच्या समोर रोडवर आरोपी लोकसेवक यांनी शासकीय पंचासमक्ष २० हजाराची लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रूपये स्विकारण्यास सहमती दिल्याचे लाच मागणी पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले.
सकाळी लाचखोरी तलाठी गिरी यांनी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्यानंतर (ता.९) रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान सापळा लावण्यात आला यावेळी शासकीय पंचापमक्ष वारसा हक्काने जमीन सातबारावर लावण्यासाठी १० हजाराची रक्कम घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. अंगझडतीत यावेळी १६६० रुपये, मोबाईल, आधार कार्ड व पँन कार्ड मिळाले. मोबाईल जप्त करण्यात आला आहे. रक्कम स्विकारताना ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोरी तलाठ्यास नायगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले व तेथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची सापळा कारवाई पोलीस निरीक्षक साईप्रकाश चन्ना यांनी केली असून पुढील तपास राहुल तरकसे, पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे करणार आहेत.



