अवकाळी पावसाची कुंडलवाडी परिसरात हजेरी, रब्बी हंगाम धोक्यात, शेतकरी चिंतेत

कुंडलवाडी :- शहर व परिसरात आज दि.२३ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान अचानक अवकाळी पाऊसाने वादळी वा-यासह हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून हवामानात बदल होवून ढगाळ वातावरण तयार झाले. त्याचे रुपांतर सोमवारी दुपारनंतर वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसाचे सावट दिसू लागल्याने रब्बी हंगाम धोक्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली. तसेच विहीर, बोअरवेल्स या सिंचन साधनांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यावर्षी मोठ्या क्षेत्रावर रब्बी हंगामात हरभरा ज्वारी भाजीपाला, करडई या पिकांची लागवड झाली. हिवाळ्यात थंडीचे वातावरण पिकांना पोषक राहील्यामुळे रब्बीतील सर्वच पिकं जोमदार आली आहेत. सध्या हरभरा, ज्वारी पीक परिपक्व होवून काढणीस आले आहेत. नेमके याच वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

अतिवृष्टीमुळे खरीप गेला असला तरी शेतकऱ्यांची आशा रब्बी पिकावर असताना आता तेही निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या घडीला आकाशात नभ दाटून येत असल्याने आलेले रब्बी पीक अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा वाया जातो की काय? अशी भिती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.



