खा.अजित गोपछडे यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी ; वाढदिवसानिमित्त मनोज मोरे यांनी केले जोरदार शक्तीप्रदर्शन
अद्यापही उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट संकेत मोरे यांनी दिले आहेत

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नुकतेच भाजपवासी झालेले बरबड्याचे भुमिपुत्र तथा प्रसिद्ध कंत्राटदार मनोज मोरे यांचा 52 वा वाढदिवस दि. २७ नोव्हेंबर रोजी होता. या निमित्ताने त्यांनी बरबडा जिल्हा परिषद गटातील आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर दुसरीकडे जुने मित्र खा.अजित गोपछडे यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्याने त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जुने भाजपाई आणि उपस्थित जनसामुदाय पाहता मी अद्यापही उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट संकेत मोरे यांनी दिले आहेत.

बरबडा जिल्हा परिषद गटासाठी लक्षवेधी ठरलेला वाढदिवस नायगाव येथील जयराज पँलेसमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार, भाजप नेते श्रावण भिलवंडे, रावण पाटील कहाळेकर, राजेश कुंटूरकर, बाळासाहेब धर्माधिकारी, बालाजी मद्देवाड, शंकर कल्याण, पंडीत पाटील, कोंडीबा शिंदे, रावसाहेब देगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित नेत्यांनी मनोज मोरे यांच्या धाडसाचे कौतुक केले कारण भाजपमध्ये कमालीची स्पर्धा असताना त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी श्रावण भिलवंडे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, मनोज पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. वास्तविक काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद उमेदवारीसाठी त्यांना कुणीच स्पर्धक नव्हता परंतु मनोज पाटलासारखा चांगला व्यक्ती भाजपला मिळाला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
तर दुसरीकडे बालाजी बच्चेवार यांनी काँग्रेसमध्ये मनोज पाटील यांची उमेदवारी पक्की असताना भाजपात आले. खा.अशोकराव चव्हाण यांनी शब्द दिला होता त्यांच्यामुळे भाजपात आलेपण खा.अशोकराव चव्हाण यांनी शब्द दिला असेल आणि त्यांच्या मनात असेल तर तुमची उमेदवारी कुणीच कापू शकत नसल्याचे ठासून तर सांगितलेच पण ज्यांनी उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते त्यांच्यासाठी सुचक इशारा दिला.
माझा नेता मला रिकाम ठेवणार नाही – मनोज मोरे
माझे वडील आणि मी काँग्रेसची आयुष्यभर सेवा केली आणि काँग्रेसनेही आमच्या कुटुंबाल भरपूर दिले. अशोकराव चव्हाण यांच्यावरील निष्ठेमुळे मी भाजपात आलो पण काँग्रेसच्या कुणावरच माझी नाराजी नाही. काँग्रेसमध्ये असताना अशोकराव चव्हाण व स्व.वसंतराव चव्हाण यांनी दुजाभाव केला नाही. त्यामुळे खा.अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले मात्र इकडे स्व.वसंतराव चव्हाण यांच्या विरोधात जाणे योग्य वाटले नाही. भाजपमध्ये येतांना माझे नेते अशोकराव चव्हाण यांच्याकडून शब्द घेवूनच भाजपमध्ये आलोय त्यामुळे माझा नेता मला रिकाम ठेवणार नाही असा ठाम विश्वास यावेळी मोरे यांनी व्यक्त केला.



