अजित दादांशी असलेलं नातं आणि विमानवारीचा किस्सा आठवत दिलीपरावंच्या डोळ्यांत अश्रू…

भगवान शेवाळे
बरबडा :- बारामतीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत घडलेल्या दुर्दैवी विमान अपघाताच्या वृत्ताने नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी यांना मोठा धक्का बसला असून, ही बातमी समजताच ते अतिशय भावनिक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून दिलीपराव धर्माधिकारी यांच्यावर अजित पवारांनी दाखवलेला विश्वास आजही त्यांच्या मनात ताजा आहे.

स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सकाळी सात वाजता नायगावकडे निघाले. त्यांनतर तिथून वापस नांदेडमध्ये आल्यावर अजित पवार स्वतः दिलीपराव धर्माधिकारी यांच्या घरी आले होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची त्यांनी जिव्हाळ्याने विचारपूस केली. तब्बल दोन तास ते याठिकाणी होते. घरातल्या प्रत्येकांसोबत मनमोकळा संवाद साधत त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्याची ही भेट आज धर्माधिकारी कुटुंबीयांच्या आठवणींमध्ये कोरली गेली असून, तीच त्यांच्या आयुष्यातील शेवटची घरगुती भेट ठरल्याची भावना आज व्यक्त होत आहे.
अजित दादांबाबत आलेल्या या धक्कादायक वृत्ताने दिलीपराव धर्माधिकारी यांची भावना अनावर झाली. “दादा म्हणजे फक्त नेता नव्हते, तर आधार आणि मार्गदर्शक होते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. खूप प्रतीक्षेनंतर आम्हाला एक सच्चा नेता, आधार मिळाला होता पण काळाने तो हिरावून घेतला. दादा आता नाहीत यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही. खूप दुःख होत आहे. आम्ही पोरके झालोत.
मागील तीन वर्षापासून माझे आणि दादाचे घनिष्ठ संबंध होते नांदेड जिल्ह्याचा पहिला जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी मला मान दिला. आमच्या हक्काचा माणूस होता. मी एक काम त्यांच्याकडे नेल होत. त्यांनी स्पष्ट शब्दात हे होणार नाही पुन्हा या कामासाठी प्रयत्न करू नका असं सांगितल.खूप स्पष्ट बोलणारे नेते होते.अशी भावना दिलीपराव धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
मी सहज दादांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेलो होतो. त्यांनी मला पाहिल्याबरोबर अरे दिलीपराव कधी आलात म्हणत चला आपल्याला नांदेडला निघायचं म्हणत त्यांनी मला त्यांच्यासोबत विमानात बसवून नांदेडला आणलं. त्यांच्यासोबत मला विमानात बसून येण्याचे भाग्य मिळालं. प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेला आमचा नेता आज आमच्यातून असा अकाली जाणे हे खूप दुःखदायक आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांच्या जवळीकतेमुळे दिलीपराव धर्माधिकारी यांचं राजकीय भविष्य उज्वल होत होतं. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तिकिटासाठी ते बरबडा सर्कल मधून आग्रही होते. या संदर्भात त्यांची दादांशी भेट सुरू होती मात्र आरक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे नांदेड जिल्हा परिषद निवडणूक पुढील टप्प्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली. जाहीर झालेल्या बारा जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून यासाठीच प्रचारासाठी बारामतीला अजितदादा जात होते आणि यातच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला.



