पाठबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा गहू उत्पादक शेतकऱ्यांना फटका
मानारचे पाणी पाळी लांबल्याने गहू उत्पादक शेतकरी संकटात

प्रकाश महिपाळे
नायगाव : शेतकऱ्यांची कामधेनूअसलेल्या मानार कालव्याला सध्या उतरती कळा लागली आहे. येथील प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कालव्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. नायगाव तालुक्यातील पाण्याचे व्यवस्थापन नायगाव येथील पाटबंधारे विभागाचा मानार प्रकल्प उपविभागीय कार्यालयामार्फत होते मात्र अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे गहू वाळून जातं असल्याचे चित्र आहे.
नायगाव तालुक्यातील मानार प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात सध्या गव्हाचे उत्पादन घेतले जात आहे. मानार प्रकल्प विभागाने सुरुवातीला जारी केलेल्या पत्रकाप्रमाणे पहिले आवर्तन २५ नोव्हेंबर रोजी सुटले. पहिल्या आवर्तनचा कालावधी हा वीस दिवसांचा होता. मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे कारण पुढे करत देगाव परिसरातील कॅनॉलचे आवर्तन ५ ते ६ डिसेंबर पर्यंतच केवळ दहा दिवसचं सोडण्यात आले.
गहू उत्पादक शेतकऱ्यांनी रोटेशनच्या शेवटच्या दोन दिवशी तरी पाणी सोडावे अशी मागणी केली होती मात्र विभागाने शेतकऱ्यांना नं जुमानता परस्पर निर्णय घेत पाणी सोडलेच नाही. परिणामी गहू उत्पादक शेतकऱ्याच्या दोन पाणी पाळीतील अंतर जवळपास ३५ दिवसांचे झाले असल्याने गव्हाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दुसरे आवर्तन १ जानेवारी रोजी सोडण्याचे नियोजन होते मात्र अद्याप कॅनॉलला पाणी आले नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरे रोटेशनच्या अगोदर कॅनॉल दुरुस्थीचे काम हाती घेण्यात आल्याने आवर्तनास उशीर तर होत नाही ना अशी शंका शेतकऱ्यांना सतावत आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अन ग्राउंड लेव्हलच्या शेतकऱ्यांच्या मागणीचा अंदाज नं आल्याने माणार प्रकल्पाच्या पाण्याचा योग्य वापर होत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.



