वादग्रस्त गटविकास अधिकारी वानखडे पुन्हा रुजू ; दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यात आनंदोत्सव

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मागच्या वर्षी आमदारांनी सर्जिकल स्ट्रईक केल्यानंतर गायब झालेले नायगाव पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी पि.एन. वानखडे पुन्हा रूजू झाले आहेत. त्यांच्या येण्याने तालुक्यातील दलाल व भ्रष्टाचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला असून. वानखडे यांच्या काळात रोजगार हमी योजनेच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता.
नायगाव पंचायत समितीमध्ये रूजू झाल्यापासून गटविकास अधिकारी पि.एन. वानखडे यांनी आपला वेगळाच गोतावळा निर्माण केला होता. विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात दलालांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्यात आला त्यामुळे सिंचन विहीरी, बांधावर वृक्ष लागवड, शेततळे, फळबाग, फुलशेती, तुती लागवड या योजनेत मोठ्या प्रमाणात अर्थिक गैरव्यवहार झाला आहे. झालेल्या बोगस कामाला वानखडे यांनी उघड उघड पाठींबा दिला होता. त्यामुळे गाव कारभारी व भ्रष्ट ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात संधी साधून घेतली होती.
वानखडे यांच्या भ्रष्ट व वादग्रस्त विषयाची जोरदार चर्चा होत असतांनाच या भागाच्या आमदारांनी दि. 27 आक्टोबर 2025 रोजी पंचायत समिती व तहसील कार्यालयात सकाळी अचानक भेट दिली त्यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासह अनेक कर्मचारी उपस्थित नसल्याने आमदारांनी गांधीगिरी करत लेटलतीफ कर्मचांऱ्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्याच्या खाबुगीरीवर अनेकांनी संताप व्यक्त केला होता.
ही बाब गटविकास अधिकारी वानखडे यांना समजताच त्यांनी त्या दिवसापासून पंचायत समितीकडे फिरकलेच नाहीत. तब्बल सहा महिने नाँटरिचेबल असलेले गटविकास अधिकारी पि.एन. वानखडे चार दिवसापूर्वी नायगाव पंचायत समितीत रुजू झाले. हे रुजू होताच नायगाव पंचायत समितीमध्ये दलालांच्या हालचाली वाढल्या असून ज्यांची कामे मागच्या सहा महिण्यापासून पेंडींग पडली आहेत असे गाव कारभारी व ग्रामसेवकांच्याही पंचायत समितीमध्ये चकरा सुरु झाल्या आहेत.
मागच्या सहा महिण्यात प्रभारी कारभार असल्याने अनेक बोगस कामे करता आली नाहीत पण प्रशासकीय राज असल्याने आता नायगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या सोईनुसार आणि गावकारभाऱ्यांच्या इच्छेनुसार काम करता येणार असल्याने तालुक्यातील दलाल लाँबी व भ्रष्टाचारी अनंद व्यक्त करत आहेत.
ऐन दिवाळीच्या तोंडावर गटविकास अधिकारी वानखडे गायब झाले होते परंतु जाता जाता पत्रकारांच्या नावाने जमा केलेली रक्कम घेवून गेल्याचा आरोप आहे.



