ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात तीव्र चलन टंचाई; खा. अशोकराव चव्हाणांचे रिझर्व्ह बँकेला तातडीचे पत्र

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : जिल्ह्यातील तीव्र चलन टंचाईबाबत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रादेशिक संचालकांना पत्र लिहून पुरेसे चलन तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात सध्या लग्नसराईचा हंगाम आणि शेतकऱ्यांची पेरणीपूर्व लगबग सुरू असतानाच चलनाची मोठी टंचाई निर्माण झाली असून, खा. अशोकराव चव्हाण यांनी या गंभीर परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, नांदेड जिल्ह्यासाठी मुख्य ‘करन्सी चेस्ट’ म्हणून काम करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिवाजीनगर शाखेतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या चेस्टची मर्यादा ४५० कोटी रुपये असताना सध्या तिथे केवळ मर्यादित रक्कम उपलब्ध आहे. जिल्ह्याची दैनंदिन गरज पाहता उपलब्ध निधी जेमतेम दोन दिवस पुरू शकेल अशी स्थिती आहे. चलनाचा पुरवठा कमी असल्याने याचा मोठा फटका लग्नकार्य असलेल्या कुटुंबांना आणि बियाणे-खते खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेत रोख रकमेचे महत्त्व मोठे असून, सद्यस्थितीत डिजिटल व्यवहारांतही अनेक अडचणी आहेत. नांदेड करन्सी चेस्टकडून सातत्याने मागणी करूनही नागपूर विभागाकडून पुरेशी रोख रक्कम पुरवण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेने या समस्येची तातडीने दखल घेऊन जिल्ह्याची पुढील सात दिवसांची गरज पूर्ण करण्यासाठी किमान २०० कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, असेही खा. अशोकराव चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker