युवा शेतकरी तथा पत्रकार सुभाष पेरकेवार यांची आत्महत्या

New Bharat Times नेटवर्क
नरसी : येथील युवा शेतकरी तथा पत्रकार सुभाष संभाजी पेरकेवार (नरसीकर) यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. २२ डिसेंबर रोजी नरसी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून ते ४५ वर्षाचे होते.
नरसी येथील युवा शेतकरी तथा पत्रकार सुभाष पेरकेवार हे लोकशाहीला बळकट करणाऱ्या पत्रकारितेत काम करत असताना आपली पारंपरिक शेती कसत होते. सततची नापिकी, यातून झालेले कर्ज, कर्जाच्या वसुलीची भीती आणि यातून निर्माण झालेले नैराश्य यामुळे सुभाष पेरकेवार यांनी आज दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावाई, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परीवार आहे .
कै.सुभाष पेरकेवार यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी ५ वाजता नरसी येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दै.प्रजावाणीचे गोवर्धन बियाणी, शंतनू डोईफोडे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे, महानगराध्यक्ष रवींद्र संगणवार, किरण कुलकर्णी, श्रावण भिलवंडे, प्रकाश भिलवंडे, संभाजी भिलवंडे, रवींद्र भिलवंडे, पत्रकार राम तरटे, तालुक्यातील पत्रकार, पेरकवार यांचे मित्रमंडळी यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थितीत होते.



