‘पन्नास खोके एकदम ओके’ या वाक्याने नायगाव मतदार संघात भाजप उमेदवाराची धाकधूक वाढली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : ‘पन्नास खोके एकदम ओके’ ही म्हण महायुती सरकारच्या मानगुटीवर बसली आहे. मानगुटीवर बसलेले ही म्हण पिछा सोडताना तर दिसत नाहीच पण याच वाक्याने नायगाव विधानसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवाराला अक्षरशः घाम फुटला आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारात नेतेमंडळी पन्नास खोके देवून धोक्याने सरकार पाडण्याचे महापाप केले असल्याचा आरोप करत असल्याने भाजपच्या उमेदवाराची धाकधूक वाढली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पाडताना प्रत्येक आमदाराला फोडण्यासाठी ‘पन्नास खोके’ दिले असल्याचा आरोप आजही होतो आहे. नायगाव मतदार संघात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण व नायगाव विधानसभा मतदार संघाच्या महिला उमेदवार डॉ. मिनल खतगावकर यांच्या प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांनी वारंवार ‘पन्नास खोके एकदम ओके’ या म्हणीचा वारंवार वापर करत आहे. पन्नास खोक्याचा प्रयोग राज्य पातळीवर झाला असला तरी याचा फटका नायगाव विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवाराला दररोज बसत आहे.
भाजपच्या मताचे विभाजन करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वारंवार पन्नास खोक्याची आठवण करुन देत असल्याने मतदारात महायुतीच्या उमेदवाराबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. सुरुवातीला भाजप उमेदवार बाजी मारेल असे वाटत असतांना केवळ आठच दिवसात नायगाव मतदार संघातील वारे उलटे फिरत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्रात भाजपने फोडाफोडीचे केलेले राजकारण मतदारांना रुचलेले दिसत नाही. त्यामुळे मतदार संघात प्रचारादरम्यान भाजपच्या मंडळींना कटु प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाला हाताळण्यात अपयश तर आलेच पण भाजपचे नेते आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे यांना खिंडीत पकडण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याने मराठा समाज भाजपच्या विरोधात आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे मराठा ओबीसी संघर्ष वाढवण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न होताना दिसत असल्याने ओबीसी मतदारही भाजप पासून दुरावत चालला आहे. त्यातच वंचित आघाडीच्या उमेदवाराची जोरदार घौडदौड सुरु असून वंचितचा उमेदवार हा लिंगायत असल्याने याचा फटका भाजप उमेदवार राजेश पवार यांनाच बसेल असे जाणकार म्हणत आहेत.
माझ्यासमोर कुणीही उभ राहीले तरी मला काहीच फरक पडणार नाही असा दावा करणाऱ्या भाजप उमेदवार राजेश पवार यांना ‘पन्नास खोके एकदम ओके’ ही म्हण आता जिव्हारी लागत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करतांना ‘पन्नास खोके एकदम ओके’ या बम्हणीचा उल्लेख केल्याशिवाय सभेचा शेवट करत नसल्याने नायगाव विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. ‘पन्नास खोके एकदम ओके’ ही म्हण भाजपच्या उमेदवाराला आडचणीत आणणारी ठरण्याची शक्यता वाढली आहे.