भरधाव कार विजेच्या खांबावर धडकली ; एक ठार दोन जखमी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : भरधाव कारचा ताबा सुटल्याने अनियंत्रित होवून विजेच्या खांबावर धडकल्याची घटना रविवारी सायंकाळी नरसी-मुखेड राज्यमार्गावर रातोळी कॅम्पजवळ घडली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर कारमधील अन्य चौघांपैकी २ जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे.
सावरगाव पीर(ता.मुखेड) येथील बागवान कुटुंब बोधन येथे लग्न सोहळा आटोपून महाराष्ट्र १४ ई सी ९७१६ क्रमांकाच्या कारने परत गावाकडे सावरगाव ला जात असताना नरसी-मुखेड राज्यमार्गावरच्या रातोळी कॅम्प नजीक वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार विजेच्या खांबावर धडकली त्यानंतर ती पुढे मुख्य रस्ता सोडून बाजूच्या शेतात ती थांबली.कार वेगात असल्याने खांबावर ती धडकताच मोठा आवाज झाला.
घटनास्थळी अबूबकर खलील बागवान (२१)यातरुणाचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अन्य चौघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले.अपघात एवढा भीषण होता की कारमधील सर्व जण दूरवर फेकले गेले.अपघात घडताच आवाजाने रातोळी कॅम्प येथील स्थानिक नागरिक तसेच रस्त्यावरून जाणारे वाहनचालक प्रवासी मदतीला धावून आले.आपतकालीन आरोग्यसेवेच्या रूग्णवाहीकेतून गंभीर जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.
तर… मोठी जिवीतहानी झाली असती. भरधाव वेगातील ही कार वीज वाहीनीच्या खांबावर धडकली.सदरील खांब लोखंडी होता तसेच घटनेच्या वेळी वीजपुरवठा सुरू होता.तो खांब सिमेंट चा असता किंवा वीज वाहीनीची तार तुटली नाही त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली आहे.घटनेनंतर खबरदारी म्हणून तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात होता.
दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर! या घटनेतील बागवान कुटुंब एक विवाह सोहळा आटोपून गावाकडे जात होते.उद्या याच कुटुंबात दुसरा विवाह सोहळा असल्याने त्या तयारीत हे कुटुंब होते.लग्नसोहळ्याच्या निमित्ताने घरात आनंदाचे वातावरण असतानाच ही अपघाताची दुर्दैवी घटना घडल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.