तहसीलदारांची पहाटे धाडसी कारवाई ; राहेर येथे वाळूचा अवैध उपसा करणारी बोट जाळून केली नष्ट

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : गुरुवारी पहाटे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी वाळू माफीयाविरुध्द धाडसी कारवाई केली असून. राहेर येथे नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करणारी बोट व इतर साहित्य जाळून नष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारची पहीलीच कारवाई करण्यात आल्याने तहसीलदारांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

मागील काही दिवसापासून नायगाव तालुक्यात महसूल विभागाला अंधारात ठेवून काही माफीया कुठलीही परवानगी नसताना राहेर परिसरातील नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करत होते. यामुळे शासनाचे तर अर्थिक नुकसान तर होत होतेच पण महसूल विभागाचीही बदनामी होत होती. त्यामुळे गुरुवारी पहाटे तहसीलदारांनी धाडसी पाऊल उचलून वाळू माफीयांचे कंबरडे तर मोडलेच पण या कारवाईतून माफीयांना एकप्रकारे इशाराही दिला आहे.
कुठलीही परवानगी नसताना राहेर परिसरात गोदावरी नदी पात्रातून बोटच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना मिळाली. त्यांनी या प्रकाराची कुठेही वाच्यता न करता कारवाई करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पहाटे स्वतः, वाहण चलक तुकाराम पुरी, सुधाकर डोईवाड, डोंगरगाव पोलीस पाटिल -जमनाजी डोईवाड, कुंटुर पोलीस ठाण्याचे कर्मचारी बशीर शेख व पोलीस वाहन चालक यांना सोबत घेवून थेट गोदावरी नदी गाठले. यावेळी त्यांना बोटच्या सहाय्याने वाळूचा उपसा करण्यात येत असल्याचे दिसून आल्याने त्यामुळे बोटसह इतर साहित्य जाळून नष्ट केले.
तहसीलदार गायकवाड यांनी सदरच्या कारवाईबाबत गुप्तता पाळली होती. याबाबत तलठी व मंडळ अधिकाऱ्यांना काहीही माहिती नव्हती. त्यामुळे तहसीलदारांना अंधारात ठेवून तलाठी व मंडळ अधिकारी वाळू माफीयांना बळ देत नाहीत ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.