उमरी शहरातील तलाव सुशोभीकरणाच्या कामातही गैरव्यवहार : दोन योजनेचा निधी एकाच कामावर खर्च

अंकुशकुमार देगावकर
उमरी : सामाजिक कार्यकर्ते संतोष गुंडाळे यांच्या एका तक्रारीनंतर नगरपालिकेतील कारभाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा बाहेर येत असून. उमरी शहरातील सरोवराच्या सुशोभीकरणासाठी दोन योजनेचा जवळपास ७ कोटी निधी मंजूर झाला आहे. मात्र या निधीतून सरोवराचा कमी आणि अधिकारी व गुतेदाराचा अधिकचा विकास होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
उमरी शहरातील तलावाच्या सुशोभीकरण व सौंदर्यीकरणासाठी आणि पर्यावरणीयद्रष्ट्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत पर्यावरण विभागाने दि. ८ मार्च २०१९ रोजी ३ कोटी ४९ लक्ष ६७ हजार ४०० एवढ्या रक्कमेच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली. मंजूर रक्कमेपैकी १० टक्के नगर पालिका उपलब्ध करुन दिली आहे. या रक्कमेतून करावयाच्या कामाची सुची दिली होती. त्यात लावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे, किनारा सौंदर्यीकरण, हरित पट्टा विकसित करणे, कुंपण घालणे, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौका विहार, कमी किमतीची स्वच्छतागृह यासह अनेक उपाययोजना होत्या. पहील्या टप्प्यात १ कोटी ५७ रक्कम वितरित करण्यातही आली होती. मात्र उमरी नगर पालिकेने अटी व शर्थीची पुर्तता करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लावला. पहील्या टप्प्यातील काम झाल्यावर कामाच्या भौतिक प्रगतीचा अहवाल, पाण्याच्या गुणवत्ता अहवालाच्या प्रती, प्रकल्प सनियंत्रण समिती बैठकीचे इतिवृत्त खर्चाचे प्रत्येक तिमाहीचे उपयोगिता प्रमाणपत्र दिल्याशिवाय पुढील टप्प्यातील निधी मिळणार नव्हता.
कामाच्या सुरुवातीलाच नगरपालिकेने स्मारक तयार करणे, डस्टबिन, करमणूक क्षेत्र तयार करणे, बेंच पुरवणे, तलावासाठी धरणाच्या रेषेसह भिंतीला आळा घालणे, कठड्यावर पदपथ बांधकाम, सौर ऊर्जा पथदिवे, सोलार पंप अदि कामासाठी अडव्हांस रक्कम देवून टाकली. अडव्हांस दिलेल्या रक्कमेतील अनेक कामे आजपर्यंत झाली नाहीत. प्राप्त निधीचेच तिनतेरा वाजवल्यानंतर पुढील टप्प्यातील निधी मिळला नाही. तलावाच्या कामाची विल्हेवाट लावल्यानंतर याच तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्प तयार करुन केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० या योजनेतून ३ कोटी ६० लाखाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून घेतले. मंजूर निधीतून तलावाचा विकास, तलावाचे निर्जंतुकीकरण, विसर्जन घाट आणि अप्रोच रस्ता असा ढोबळ आराखडा आहे.
राज्य सरोवर संवर्धन योजनेचे काम अर्धवट असतांना केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० या योजनेच्या कामाचा गुपचूप शुभारंभ २०२३ मध्ये केला शुभारंभाची उमरी शहरात जोरदार चर्चा झाली. शुभारंभानंतर कामाला सुरुवात झाली होती पण नतर काम अर्धवट अवस्थेत आहे. अगोदरचे काम अर्धवट आणि नवीन योजनेचेही काम बंद आहे. त्यामुळे नगर पालिकेचे अधिकारी आणि गुत्तेदार केवळ शासनाचा निधी हडप करण्याचेच काम करतात का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
गोरठेकरांनी सांभाळलेल्या नगर पालिकेत मागच्या दोन वर्षापासून भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहत आहे. पालिकेतील कारभाऱ्यांनी भरमसाठ तरतुदी ठेवून अंदाजपत्रक तयार करत आहेत पण काम मात्र थातूरमातूर करत असल्याचे दिसून येत आहे. उमरी शहराचे वैभव असलेल्या शहरातील तलाव सुशोभीकरणाच्या कामातही या कारभाऱ्यांनी घोळ घालून ठेवला आहे.