सेतू केंद्रावरून भरलेल्या लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूरीच्या प्रतिक्षेत

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अँप विकसित केल्यानंतर या अँपवरुन (ता.६) आँगस्ट पर्यंत नायगाव तालुक्यात २६ हजार ८६१ भरण्यात आले. यापैकी २५ हजार १२१ अर्ए मंजूर झाले असले तरी ३१ जुलै नंतर सेतू केंद्रावरुन आजपर्यंत किती अर्ज भरले याची माहिती प्राप्त झाली नसल्याने ते मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे सेतूकेंद्रावरुन अर्ज भरलेल्या बहिणींची धाकधूक वाढली आहे.
मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यानंतर त्याची जोरदार जाहिरातबाजीही करण्यात आली. त्यामुळे या योजनेला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. काही लोकप्रतिनिधींनी मोफत अर्ज भरुन देण्यासाठी बँनरबाजी केली पण त्यांनी किती अर्ज भरले हा संशोधनाचा विषय असला तरी शासनाने विकसित केलेल्या अँप मोबाईलमध्ये घेवून नायगाव तालुक्यातील २६ हजार ८६१ महिलांनी अर्ज भरले. भरलेल्या अर्जापैकी तालुकास्तरीय समितीने (ता.६) आँगस्ट पर्यंत २५ हजार १२१ अर्ज मंजूर केले असून ४९ अर्ज नामंजूर करण्यात आले असून १६९१ अर्ज शिल्लक आहेत.
तालुकास्तरीय समितीने मंजूर केलेल्या अर्जावर जिल्हा समितीने मंजुरी देणे आवश्यक आहे. ते काम जिल्हास्तरावर सुरु असले तरी मंजुरी देण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय आजपर्यंत १३ हजार ४१७ अर्ज मंजूर केले आहेत. नायगाव तालुक्यातील अर्जांना मंजूर देण्यासाठी दिरंगाई होत असली तरी इतर तालुक्यातील अर्ज मंजरीची प्रक्रिया गतिमान दिसून येत आहे.
लाडक्या बहिण योजनेची सुरुवात झाल्यानंतर आजपर्यंत मोबाईल अँपवरुन अर्ज भरण्यात आले असून तीच आकडेवारी समोर आली आहे विशेष म्हणजे ३१ जुलै नंतर सेतूकेंद्रावरुन अर्ज भरण्यास सुरुवात झाली परंतु आजपर्यंत सेतूकेंद्रावरुन किती अर्ज भरण्यात आले याची आकडेवारी संबधीत यंत्रणेपर्यत आलेली नाही. त्यामुळे या अर्जापैकी एकही अर्ज मंजूर झाला नसल्याने सेतूकेंद्रावरुन भरलेले लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत.
एकीकडे मोबाईल अँपवरुन भरलेले अर्ज मंजूर होत आहेत तर दुसरीकडे सेतूकेंद्रावरुन भरलेल्या एकाही अर्जाला मंजुरी तर मिळालीच नाही पण किती अर्ज भरण्यात आले याची आकडेवारी समोर आली नसल्याने लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली आहे.
रक्षाबंधनाला ज्या महिलानी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजुर झाले आहेत त्या महिलां भगिनीच्या खात्यावर दोन हप्ते म्हणजे सुमारे 3000 रुपये जमा होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे आता रक्षाबंधन अगदी तोंडावर येत असल्यामुळे सर्वच महिला भगीनीचे फॉर्म भरण्यासाठी व ते अर्ज मंजुर होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे.
भरलेल्या अर्जांना मंजुरी देण्याचे काम सुरु असून आजपर्यंत मोबाईल अँपवरुन भरलेल्या अर्जांना मंजुरी देण्याचे काम सुरु आहे. मात्र सेतूकेंद्रावरुन किती अर्ज भरण्यात आले आहेत याची आकडेवारी व भरलेले अर्ज संबधीत यंत्रणेपर्यत आली नाहीत. त्यामुळे ते अर्ज मंजरीच्या प्रतिक्षेत असून येत्या दोन तीन दिवसात सेतूकेंद्रावरुन भरलेल्या अर्जांनाही मंजुरी मिळेल अशी मागणी तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी राहूल शिवशेट्टे यांनी सांगितली.