लाभार्थ्यांना शासकीय अनुदान टपाल कार्यालयातून वितरीत करा ; डाक इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात खा.रवींद्र चव्हाण यांची सूचना

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना अनुदानाचा पूर्ण लाभ घेता यावा यासाठी बँकांमार्फत अनुदान वाटप न करता ते टपाल कार्यालयामार्फत सुरु करावे, अशा सूचना खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी नायगाव येथील नूतन उपडाकघर इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात वरिष्ठ अधिकार्यांना केल्या.

सोमवार दि. 27 जानेवारी रोजी नायगाव येथील उपडाकघर नूतन इमारतीचे लोकार्पण खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, तर व्यासपीठावर ,क्षेत्रिय डाक निदेशक अजिंक्य काळे, नायगावच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना चव्हाण आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना खा.रवींद्र चव्हाण म्हणाले, केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे अनुदान सध्या लाभार्थ्यांना बँकेतून वितरीत केले जाते.

परंतु विविध कारणे दाखवून संबंधित बँकांकडून अनुदानाची रक्कम कपात करण्याचे प्रकार वाढत आहेत. परिणामी लाभार्थांना पूर्ण अनुदान मिळत नाही. हा प्रकार थांबविण्यासाठी अनुदान वाटपाची सुविधा टपाल विभागाकडे वर्ग करावी. नागाव येथे पासपोर्ट सुविधा उपलब्ध नसल्याने गरजूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

येथील टपाल कार्यालयात ही सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी, शिवाय कारेगाव फाटा आणि बार्हाळी येथे नवीन डाक कार्यालय सुरु करून या भागातील जनतेची गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण करावी, अशाही सूचना त्यांनी केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड विभाग अधिक्षक डाकघर मोहम्मद खदीर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.किरण डांगे व अक्षय कुलकर्णी यांनी केले.
यावेळी माधव आप्पा बेळगे, श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, तहसीलदार धम्मप्रिय गायकवाड, नगराध्यक्ष अर्चनाताई चव्हाण, पंकज चव्हाण, सूर्यकांत खेडकर, वहाबोदीन साब, रघुनाथ सोनकांबळे, प्रकाश हणमंते, पंढरीनाथ भालेराव,बालाजी पवार गोळेगावकर, सुरेश पाटील कल्याण, हणमंत बेंद्रिकार, शरद भालेराव, विजय भालेराव, अशोक पवळे सर, गंगाधर भिलवंडे, पोस्ट ऑफिसचे कर्मचारी उपस्थित होते.