अंधश्रद्धेचा त्याग करून सर्वांनी वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारावा – प्रा.डॉ.शिवाजी कांबळे

मोरे मनोहर
किनाळा :- अंधश्रद्धेच्या साह्याने भोंदू बाबा भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक करतात यासाठी संत तुकाराम महाराज आणि महामानवानी बुद्धी प्रामाण्यवादाचा स्वीकार करून जनतेची पिळवणूक करणाऱ्या ढोंगी भोंदू बाबावर प्रहार केला त्याचप्रमाणे सर्वांनी अंधश्रद्धेचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा असे प्रतिपादन प्रा.डॉ.शिवाजी कांबळे यांनी किनाळा तालुका बिलोली येथे बहि:शाल व्याख्यानमालेत बोलताना आपले मत व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील श्री मधुकरराव बापुराव पाटील खतगावकर महाविद्यालयातील बहिःशाल शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने किनाळा ता. बिलोली येथे दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन: काळाची गरज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने हे होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डॉ.शिवाजी कांबळे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा.डॉ.शिवाजी कांबळे म्हणाले की विवेकवादी दृष्टिकोनाचा अवलंब केला तर चिकित्सक वृत्ती निर्माण होऊन भोंदूबाबाच्या फसवणूकीपासून सावध राहता येते.तसेच त्यांनी महाराष्ट्रात नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा२०१३ याविषयी उपस्थित गावकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना सरपंच विठ्ठल माने यांनी अंधश्रद्धा आणि श्रद्धा या दोन बाबीतील वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश देगलूरे यांनी केले तर सहदेव सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपसरपंच बालाजी पाटील, पत्रकार शेषराव कंधारे, पत्रकार मनोहर मोरे, पोलीस पाटील राजेश पाटील भोसले, व्यंकटराव पाटील शेळगावे, बालाजी पालीमकर, अविनाश गोजेगावे, शुभम भोसले आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.