राष्ट्रवादी काँग्रेस शिव, शाहू, फुले आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही – ना.अजित पवार

प्रकाश माहिपाळे
नायगाव : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सरकारसोबत असली तरी आम्ही आमची विचारधारा बदलली नाही. आमची शिव, शाहू,फुले, आंबेडकरांची विचारधारा हि कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार असल्याचे परखड मत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार रविवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत नायगाव तालुक्यातील नरसी येथे पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर, माजी आमदार नवाब मलिक, आ.राजू भैय्या नवघरे, आ.विक्रम काळे, माजी आमदार मोहन आणा हंबर्डे, अविनाश घाटे, रामदास सुमठाणकर, सरजितसिंह गिल, प्रवीण चिखलीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री भास्करराव खतगावकर, सोबतच माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. मिनल खतगावकर, सरजींतसिंघ गिल, बिलोली बाजार समितीचे अध्यक्ष रवि खतगावर, अशोक मुगावकर, भास्करराव भिलवंडे, राजू गंदीगुडे, गणेश करखेलीकर, बाबाराव भाले, साईनाथ निवले, मंगल देशमुख, दिपक पावडे आदिसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
पुढे बोलताना ना.अजित पवार म्हणाले कि, छत्रपतीनी बारा बलुतेदारांना सोबत घेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कुणाशीही भेदभाव केला नाही, महिलांना सन्मानाची वागणूक होती पण अलीकडच्या काळात काहीजन राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत अशी खंत व्यक्त करुन बेरजेचे राजकारण करतांना शेवटच्या माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
लाडक्या बहिणीच्या मानधन वाढीबाबत बोलताना ना.पवार म्हणाले कि, मी अर्थमंत्री असल्याने राज्याची अर्थिक परिस्थिती कशी आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे राज्याची अर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० देणार असल्याचे स्पष्ट केले.
शरद पवारामुळे मी मंत्री झालो – खातगावकर
सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात अजित पवार यांच्या बरोबरच मी ही मंत्री होतो पण त्यावेळी मला शंकरराव चव्हाण यांनी नाही तर शरद पवारांनी मला मंत्री केले. कारण नाईकासोबत माझे संबध चांगले होते. त्यांनी माझी शिफारस केली व मी मंत्री झालो. याबाबत मी शंकरराव चव्हाण यांना विचारलो साहेब मला मंत्री कोण केल तर त्यांनी शरद पवारांनी मंत्री केल्याचे सांगितले असा किस्सा खतगावकरांनी अजित पवार यांच्या समोरच सांगितला.
प्रास्ताविक भाषणात मिनल खतगावकरांनी खासदार रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता टिका केली आहे. त्या म्हणाल्या की नायगाव विधानसभा मतदारसंघातून २०२४ ची विधानसभा निवडणुक काँग्रेसकडून लढवली. मला ८० हजार मतदारांनी आशीर्वाद दिला मात्र पक्षातील काही लोकांनी आम्हाला दगा दिला त्यामुळे आमचा पराभव झाला आहे. त्यामुळे आम्ही आमची भूमिका बदलली असल्याचे त्यांनी सांगितले.