लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ धर्माबादमध्ये अतिवृष्टीग्रस्तांचे ‘भीक मागो’ आंदोलन

New Bharat Times नेटवर्क
धर्माबाद : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे जनावरांचे, पीकांचे, घरे व मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. संतप्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने धर्माबाद शहरातील पानसरे चौकात लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ ‘भीक मागो’ आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला.

आंदोलनात शेतकऱ्यांनी हातात वाट्या घेऊन “तीन खासदार, एक आमदार, एक मंत्री — कोणीच धर्माबादकडे फिरकले नाही”, अशा घोषणा देत निषेध केला. सरकारकडून आणि लोकप्रतिनिधींनी वेळेवर मदतीचे कोणतेही ठोस पाऊल उचललेले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी ‘आम्ही भीक मागून जगायचं का?’ असा सवाल उपस्थित करत सरकारची आणि लोकप्रतिनिधींची झोप मोडण्याचा प्रयत्न केला.
मदतीचे तर कुठलेच आश्वासन नाही पण भेट देवून धिर देण्याचेही काम लोकप्रतिनिधींनी केले नाही. विशेषतः मतदारसंघात महापुराने थैमान घातलेले आ. राजेश पवार विदेशात मौजमजा करत आहेत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करतात येत आहे. असंवेदनशील लोकप्रतिनिधीच्या निषेधार्थ पुरग्रस्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनामुळे शहरात मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांची मागणी आहे की, तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी व या भागाला तातडीने मदतीचा दर्जा द्यावा.
पालकमंत्री आले पण आमदार नाही…
दोन दिवसापूर्वी आलेल्या महापुराने शेतातील पिकांचा चिखल झाल तर शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले. त्यामुळे खा. रवींद्र चव्हाण यांनी तातडीने पुर परिस्थितीची पाहणी करुन संकटात असलेल्या शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले तर पालकमंत्री ना. अतुल सावे यांनीही (ता.३०) रोजी नायगाव तालुक्यात भेट देवून पाहणी केली पण या भागाचे आमदार राजेश पवार आले नसल्याने अपदग्रस्त नाराजी व्यक्त करत आहेत.



