शासकीय कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दर्शनी भागात न लावल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : ज्या ठिकाणी नौकरी करत आहेत त्या कार्यालयाचे ओळखपत्र संबधीत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. पण अनेक कर्मचारी व अधिकारी ओळखपत्र न लावता स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची अडचण होते. ही अडचण ओळखून शासनाने दि. 10 सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढून कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागात लावण्यात यावेत अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयात आल्यानंतर अधिकारी कोण आणि कर्मचारी कोण हे तर ओळखू येतच नव्हते पण ओळखपत्र नसल्याने कर्मचारी आपले टेबल सोडून कुठे फिरत आहेत याचाही पता लागत नव्हता. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक काढून अनेकवेळा सुचना दिलेल्या होत्या. तरीही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागात लावत नाहीत असे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा एकदा दि. 10 सप्टेंबर ला एक परिपत्रक काढून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे अशा स्पष्ट सुचना दिल्या आहेत.
जर कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणा-या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असा सज्जड इशारा दिला असून अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांना दिले आहेत.



