सार्वजनिक बांधकाम विभाग देयक प्रकरण : आ.राजेश पवारांच्या विजयात खारीचा वाटा असलेल्या गुतेदाराच्या विरोधात तक्रार

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नुसरत कंन्स्ट्रक्शन चे मोईज करखेलीकर यांचा आ. राजेश पवारांचे कट्टर समर्थक पासून सुरु झालेला प्रवास धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधक म्हणून थांबला. त्यानंतर आ. पवार यांनी देयके न देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्याचे समोर आले. तक्रारीच्या प्रकरणामुळे जिल्ह्यात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.
में.मोरे कन्स्ट्रक्शन, में. गार्गी डेव्हलपर्स आणि में. नुसरत कन्स्ट्रक्शन हे नांदेड जिल्ह्यातील एक नामांकित व आपल्या दर्जेदार कामाचा दर्जा टिकवून ठेवलेले कंत्राटदार म्हणून ओळख आहे. या तीन पैकी नुसरत कंन्स्ट्रक्शनचे मोईज करखेलीकर हे आ. राजेश पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून पुढे आले होते.
मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आ. राजेश पवार यांच्या विजयासाठी तण, मण व धनासह ताकत लावून विजयात खारीचा वाटा उचलला. धर्माबाद तालुक्यात मताधिक्य वाढवण्यासाठी जोरदार काम केल्याच्या 20 ते 25 दिवसातच करखेलीकर यांच्यापासून आ. राजेश पवार यांनी अंतर ठेवून वावरण्यास सुरुवात केली.
त्यानंतर विविध कामाचे टेंडर भरण्यावरुन खटके उडत गेले. नंतर तर मोईज करखेलीकर आ. राजेश पवार यांच्यात बिनसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आणि धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत तर मराठवाडा जनहित पार्टीचा उदय झाला.
मोईज करखेलीकर यांच्या पुढाकाराने मराठवाडा जनहित पक्ष धर्माबाद नगरपालिकेच्या मैदानात उतरला. या पक्षाने मोठा धमाका केला. १५ जागा जिंकल्या तर दुसरीकडे आ.राजेश पवार यांच्या भाजपला ७ जागा मिळाल्या. मोईज करखेलीकर यांच्यामुळे धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा रथ अडवला गेला.
तेव्हापासून मोईज करखेलीकर हे आ.पवारांचे कट्टर विरोधक मानले जावू लागले. धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभव हा आ. पवार यांच्यासाठी एक धक्का होता. मात्र त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा धक्का किती खोलवर बसला याचा प्रत्यय आला.
नांदेड जिल्ह्यातील राजकारणात कंत्राटदार आणि राजकीय नेते यांचे नेहमीच सख्य असते. एखाद्या वेळेस मतभेद झाले तरी आजपर्यंत एखाद्या आमदार किंवा खासदारांनी कंत्राटदाराचे देयके अडवण्यासाठी लेखी पत्र दिल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे आ.राजेश पवार यांनी मोरे कन्स्ट्रक्शन, में.गार्गी डेव्हलपर्स आणि में. नुसरत कन्स्ट्रक्शन यांच्या बाबतीत दिलेल्या पत्रामुळे मात्र जिल्ह्यात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.



