नांदेड जिल्हा परिषद सतर्क ; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळा आता ‘सकाळच्या सत्रात’
वाढत्या उष्म्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल; आता भरणाऱ्या सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत

प्रकाश महिपाळे
नांदेड : राज्यात उन्हाचा तडाका वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा परिषद नांदेड प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता शाळा सकाळी भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाने निर्गमित केले आहेत.
शिक्षण विभागाने (प्राथमिक) जारी केलेल्या पत्रानुसार, ६ मार्च २०२६ पासून खालीलप्रमाणे बदल लागू होतील:
- शाळेची वेळ: एका सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ सकाळी ८:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत राहील.
- मध्यांतर (सुटी): शाळेची मधली सुटी २० मिनिटांची असेल (सकाळी ११:०० ते ११:२० या वेळेत).
- नियोजन: दुपारच्या सत्रात भरणाऱ्या शाळांनी सुद्धा त्यांच्या वेळेत बदल करून, आवश्यक तासिका पूर्ण होतील अशा पद्धतीने मुख्याध्यापकांनी नियोजन करावे व त्याचे वेळापत्रक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावे.
- या बदलामुळे आर.टी.ई. अधिनियम २००९ मधील तरतुदींचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक वर्षातील कामाचे किमान दिवस आणि तासिका कमी होणार नाहीत, याची नोंद मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. दुपारच्या वेळी मुलांना शाळेतून घरी जाताना उष्माघाताचा (Heat stroke) त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन New Bharat Times बातमी लावली होती की शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने हा विद्यार्थीभिमुख निर्णय घेतला आहे.
“उन्हाची तीव्रता लक्षात घेता विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. सर्व शाळांनी या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी तातडीने करावी.”
— शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड.



