उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर रामतीर्थ पोलीसांच्या हप्तेखोरीची चर्चा सुरु

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाँजवर कारवाई करुन ६ परप्रांतीय मुलींची सुटका केली. यामुळे नरसी परिसरातील लाँजवर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले. या सर्व गैरप्रकाराला रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकाची ‘पाँकेट’ संस्कृती कारणीभूत असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
मागील चार पाच वर्षांपासून नरसी येथे लाँजींगच्या नावाखाली प्रस्थापित व मातब्बर मंडळींनी चक्क वेश्या व्यवसायाची दुकानदारी थाटल्याने नरसी हे वेश्या व्यवसायाचे केंद्र म्हणून परिचित झाले आहे. नरसी परिसरात सहा ते ७ लाँजींग सुरु आहेत याचा फायदा आंबटशौकीनांना होवू लागला. थोड्या वेळात जास्त कमाई होत असल्याने लाँज चालकही खोल्या देवू लागले. वेश्या व्यवसायातूनही बक्कळ कमाई होत असल्याने काही लाँज मालक लाँजवरच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ठेवू लागले तर काहीजन दलालामार्फत हा व्यवसाय सुरु केला.
विशेष म्हणजे शालेय व महाविद्यालयीन मुली व महिलांना नासवण्याचा उद्योग राजरोसपणे सुरु असताना रामतीर्थ पोलीसांच्या हप्तेखोरीमुळे संरक्षण मिळत गेले आणि उघड उघड लाँज चालकांना पाठबळ देण्याचे काम करत आहेत.
देगलूर रोडवर असलेल्या राज बार अँड लाँजींग मध्ये परप्रांतीय मुलींना आणून वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आणि या गैरप्रकाराला रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे पाठबळ देत असल्याचे समजल्याने.
बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी छापा मारुन ६ परप्रांतीय मुलींची सुटका केली. पानेगावकर यांनी धमाकेदार कारवाई करुन रामतीर्थ पोलीसांच्या हप्तेखोरीचा पर्दाफाश केला. सदरच्या कारवाईबाबत रामतीर्थ पोलिसांना कुठलाच सुगावा लागू दिला नाही. बिलोली व नायगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून ही कारवाई करण्यात आली.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळल्याने यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली होती त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे हे पंधरा दिवस पोलीस मुख्यालयात जावून आले होते. त्यानंतर अवैध धंद्यात प्रचंड वाढ झाली प्रत्येक लाँज मालकाकडून दर महिण्याला वसूली करण्यात येत असल्याने वेश्या व्यवसायही चांगलाच फोफावला आहे.
वेश्या व्यवसायासह अवैध धंद्यामुळे पोलीसांची प्रचंड बदनामी होत असल्याने तो निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करुन सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे



