वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त नायगावात कीर्तन सोहळा

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नांदेड जिल्ह्याचे लोकनेते, स्वर्गीय खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त नायगाव (बा.) येथे भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते वसंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यभर जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. साधेपणा, माणुसकी आणि सर्वसामान्यांशी असलेली आपुलकी यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कीर्तन सोहळा त्यांच्या विचारांना अभिवादन करणारा ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार युवाकिर्तीवीर ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे हरिनामाचे कीर्तन होणार असून, त्यांच्या ओघवत्या वाणीतील प्रबोधनातून भाविकांना अध्यात्मिक आणि सामाजिक संदेश मिळणार आहे.
बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत वसंत स्मृती कृषी महाविद्यालय, नायगाव (बा.), जि. नांदेड येथे हा सोहळा पार पडणार आहे. पंचक्रोशीतील गायक, वादक, भजनी मंडळे तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
कीर्तन श्रवणासह महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खा. रविंद्र वसंतराव चव्हाण, लोकसभा सदस्य, नांदेड तसेच चव्हाण परिवार व समस्त गावकरी मंडळी, नायगाव (बा.) यांच्या वतीने करण्यात आले आहे. लोकनेत्याच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा पुढे नेण्याचा हा एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रयत्न ठरणार आहे.



