अशोकराव ‘प्रताप’ घडवू शकले नाहीत : नांदेडमध्ये ‘वसंत’ फुलला

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : अशोकराव चव्हाण यांच्या नंतर काँग्रेसचे काय होईल अशी चर्चा होत असतांना माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत काटे की टक्कर देत भाजप उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यापुढे कडवे आव्हान निर्माण केले आणि दणदणीत विजय मिळवला. भाजपसाठी आपले सर्वस्व पणाला लावल्यानंतरही चिखलीकर पराभूत झाल्याने अशोकराव चव्हाण भाजपसाठी घाटे का सौदा ठरले आहेत. या विजयानंतर नायगाव मतदारसंघात प्रचंड जल्लोष करण्यात आला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याबद्दल मतदारात कमालीचा संताप निर्माण झाला होता. पक्षांतर्गत सर्वेक्षणात चिखलीकरांच्या विरोधात वातावरण होते. मात्र अशोकराव चव्हाणामुळे कमी होईल आणि दोन शक्ती एकत्र आल्याने भाजपचा एकतर्फी विजय होणार असल्याचे गणित मांडण्यात आले होते. सुरुवातीला तशी चर्चाही जिल्हाभर होवू लागल्याने चिखलीकर दुसऱ्यांदा खासदार होणार असल्याचे भकित व्यक्त करण्यात येत होते.

एकीकडे खासदार चिखलीकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसडून थोड्या उशीरानेच वसंतरावांच्या नावाची घोषणा झाली. मात्र यावेळी भाजपकडून त्यांच्या प्रकृतीच्या वावड्या उठवण्यात आल्या त्यामुळे उमेदवारी दाखल करतांनाच वसंतराव चव्हाणांनी मोठे शक्तीप्रदर्शन करुन भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली. त्यानंतर वसंतराव यांनी कडवे आव्हान उभ करुन काटे की टक्कर देण्यास सुरुवात केल्याने धास्तवलेल्या भाजपने जिल्ह्यात अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा बार उडवला आणि वातावरणात बदल करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरु झाली तर दुसरीकडे अशोकराव चव्हाण यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी भावनिक आवाहनही केले पण वसंतराव चव्हाण यांचा झंझावात काही कमी होताना दिसून आला नाही. त्यातच पंतप्रधानांनी आपल्या प्रचार सभातून विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्य केल्याने त्या समाजात नाराजी पसरली होती. त्यामुळे मुस्लिम समाजाने भरघोस मतदान केले. त्यातच मराठा आरक्षणाचा फटकाही भाजपला बसला. विशेषतः अशोकरावांना मराठा तरुणांच्या रोषाला बळी पडावे लागले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यंदा एम आय एम चा उमेदवार नांदेडच्या मैदानात नसल्याचा फायदा काँग्रेसला त्यातच वंचितच्या उमेदवाराची जादू चालल्या नसल्याने दलित समाजानेही काँग्रेसचे पारड्यात मत टाकले. त्यामुळे काँग्रेसने विजयाचा गुलाल उधळला.

खा.वसंतराव चव्हाण हे नायगावचे भुमिपूत्र असल्याने मतदारांना खासदार कोण होणार याची उत्कंठा लागली होती त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत रस्ते सामसूम दिसत होते. वसंतराव विजयाच्या समिप येताच कार्यकर्ते व तरुणाईने रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा करत होते. नायगाव शहरासह तालुक्यात फटाके वाजवून व गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला आहे.

नांदेड जिल्हा हा अशोकराव चव्हाण यांच्या नावानेच ओळखला जात होता आणि जिल्ह्यावर त्यांचा एकछत्री अंमल होता. पण ऐनवेळी त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपला साथ दिली. नेत्यांनी साथ सोडली असली तरी सामान्य मतदारांनी मात्र वसंतराव चव्हांना साथ दिली.