शिरिष आणि कैलास गोरठेकर यांच्या अपक्ष उमेदवारीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

प्रकाश महिपाळे
नायगाव : भाजपकडून आ.राजेश पवार, मनोज जरांगे यांच्याकडून शिवराज होटाळकर, वंचित कडून डॉ.माधव विभुते यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केले. मात्र दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे दोन्ही पुत्र शिरिष व कैलास गोरठेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. सोमवारपर्यंत 15 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले आहेत.

नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दि. 22 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. दि. 28 रोजी पर्यंत 15 उमेदवारांनी 17 अर्ज भरले आहेत. यात भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार, मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार शिवराज होटाळकर, डॉ.दत्ता मोरे, भगवानराव मनुरकर, माधव ताटे, माधव वडजे यांनी तर सुचिता सुरेश जोगदंड, प्रतिक्षा भगवान मनुरकर, पद्मावती भगवान मनुरकर, मोहम्मद रिझवान, गजानन चव्हाण, मोतीराम कुह्राडे अदिंनी अपक्ष तर माधव विभुते यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत वंचित बहूजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

विशेष म्हणजे सोमवारी 15 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले असले तरी चर्चा सुरु झाली ती दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या शिरिष गोरठेकर व कैलास गोरठेकर यांनी अपक्ष दाखल केलेल्या आर्जाची. कारण उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांनी कुठलाच लवाजमा न आणता अर्ज दाखल करुन गेल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेने वेग घेतला आहे. नायगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडवून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही तरीही महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय दोन्ही गोरठेकर बंधूनी घेतला होता. मात्र अचानक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कुठे बिनसले अशी चर्चा सुरु झाली आहे.
नायगावची विधानसभा चौरंगी होण्याची एकीकडे शक्यता व्यक्त केली जाण असताना दुसरीकडे गोरठेकर बंधूनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन खळबळ उडवून दिली आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन गोरठेकर बंधूंना काय साध्य करायचे आहे असेही बोलल्या जात असून भाजपचे विरोधक असलेल्या गोरठेकर बंधूंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन कुणाचे टेंशन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत अशीही राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली आहे.
मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार पाच मराठा मावळ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी जरांगे जे म्हणतील तेच करण्याचा निर्णय शिवराज होटाळकर यांनी जाहीर सभेतून केला आहे. यावेळी त्यांनी आ.राजेश पवार यांच्या कार्यशैलीचा जोरदार समाचार घेतला आहे.