हिंगोलीत वादग्रस्त ठरलेले दोन अधिकारी बिलोलीत…

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : अतिशय भ्रष्ट आणि वाळू व मुरुम माफीयांशी हितसंबंध असलेले आणि हिंगोली जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले दोन अधिकारी बिलोली महसूल विभागात रुजू झाल्याने वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.
महसूल विभागातील दरवर्षी होणाऱ्या होलसेल बदल्यामध्ये होणारी उलाढाल पाहता अधिकारी आपापल्या ठिकाणी कार्यरत असताना किती कमवत असतील याचा अंदाज येतो. कमावलेल्या रक्कमेतील हिस्सा देवून हेच अधिकारी मनासारखं ठिकाण तर मिळवतातच पण अनेक वादग्रस्त प्रकरणही दडपून टाकण्यात यशस्वी होतात. हिंगोली जिल्ह्यातील आत्महत्या प्रकरणात एक तहसीलदार दर्जाचा अधिकारी निलंबित होतो. निलंबन रद्द झाल्यावर नायगाव येथे बदली. नायगाव येथे कार्यरत असताना त्यानंतर हिंगोलीमधीलच राशनच्या प्रकरणात गुन्हा नोंद पंधरा दिवस भुमिगत व्हावे लागते.
गुन्हा नोंद झाल्यावर त्यांच्यावर कुठलीच प्रशासकीय कारवाई होत नाही. नंतर ते उजळ माथ्याने रूजू होतात नायगाववरुन लातूर जिल्ह्यात बदली पुन्हा नांदेड असा प्रवास झालेले ते साहेब आता बिलोलीत आले आहेत. त्यांची एकंदरीत कारकीर्द बघता ते कधीच सक्षम अधिकारी म्हणून नावारूपाला आले नाहीत. दुसरीकडे नको त्या लोकासोबत घसट वाढवून घेतात. त्यामुळे त्यांना निवडणूक विभागाने एका निवडणुकीपासून दुरच ठेवले होते. त्यामुळे वादग्रस्त हा शिक्का त्यांच्या माथी बसलेलाच असतानाच पुन्हा एक वादग्रस्त अधिकाऱ्याची पंधरा दिवसापूर्वी बिलोलीला बदली झाली आहे.
दोन महिण्यापुर्वी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली होती. हे प्रकरण कळमनुरीच्या दबंग तहसीलदार म्हणून ख्याती असलेल्या अधिकाऱ्याच्या अंगलट आले त्यामुळे त्यांना तेथून जावे लागले तर त्यांच्यापेक्षा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यालाही त्या आत्महत्या प्रकरणाची झळ बसली.
त्यामुळे त्यांचीही बिलोली महसूल विभागात बदली झाली आहे. दोन्ही वादग्रस्त अधिकारी बिलोलीत आले आहेत. त्यामुळे टेबलवर वजन ठेवल्यानंतर कोणतेही नियमबाह्य काम तत्काळ मार्गी लागणार असल्याने बिलोलीत मध्यस्थ सध्या सक्रीय झाले आहेत.
महसूल अधिकाऱ्यांचे नांदेड आवडते ठिकाण…
नांदेड जिल्ह्यात काम केलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यास जिल्हा सोडावा वाटतच नाही. नियमानुसार बदली झाल्यास नाईलाजाने ते जातात पण अल्प कालावधीत पुन्हा नांदेड जिल्ह्यातच येतात अशी अनेक उदाहरणे असून एक उदाहरण ताजे बिलोलीचे आहे.