नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : गड राखण्यात प्रा. रवींद्र चव्हाण यश सर्वत्र जल्लोष

प्रकाश महिपाळे
नायगाव : जिल्ह्यात काँग्रेसची अक्षरशः वाताहत झालेली असताना कडवी झुंज देत काँग्रेसचे अस्तित्व राखण्यात प्रा.रवींद्र चव्हाण यांना यश आले आहे. पोस्टल मतमोजणीअंती १४५७ मतांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यात भाजपचे संतुकराव हंबर्डे यांचा पराभव झाला आहे.

नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक सुरुवातीला काँग्रेसचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी सहज घेतली पण शेवटच्या टप्प्यात महायुतीचे भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांनी जोरदार मुसंडी मारत काटे की टक्कर दिली. त्यामुळे ते मतमोजणीच्या वेळी पहील्या फेरीपासून ते आघाडीवरच राहीले होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्रा.रवींद्र चव्हाण यांचा पराभव होतो कि काय अशी हुरहूर नायगाव मतदार संघातील जनतेला लागली होती. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण होते.
मतमोजणीच्या फेऱ्यात पुढे असलेल्या संतुकरावांचा टपाली मताने घात केला त्यामुळे जवळ आलेला विजय पराभवात बदलल्यामुळे वातावरण गंभीर झाले. त्यातच टपाली मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर बराच काळ निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्यामुळे दिड ते दोन तास कोण निवडून आले याचा अंदाज येत नसल्याने मोठ्या प्रमाणात एकदुसऱ्याला फोन करुन विचारणा करण्यात येत होती. त्याचबरोबर नायगाव शहरात व परिसरात मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आले. त्यानंतर शहरात फटाक्यांची अतिषबाजी सुरु झाल्याने एकच जल्लोष करण्यात आला.
नांदेड लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून नायगावसह सर्वच मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराची वाताहत झाली त्यामुळे भाजप उमेदवार संतुकराव हंबर्डे यांना मताधिक्य मिळाले. शेवटच्या फेरीअखेर ११ हजाराच्या वर मताधिक्य होते. पण टपाली मतदान मोठ्या प्रमाणात प्रा. रवींद्र चव्हाण यांना मिळाल्याने ते अखेर विजयी घोषित करण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाली असल्याने लोकसभा पोट निवडणुकीत काय होते याची उत्सुकता लागलेली असतात प्रा.रवींद्र चव्हाण यांना गड राखण्यात यश आले आहे. त्यांच्या विजयाबद्दल शहरात रात्री उशिरापर्यंत जल्लोष करण्यात आला.