रुई (खु.) येथील चुकीच्या फेरफार प्रकरणी : तलाठी हाके यांना तहसीलदारांचे अभय

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : खोट्या व बनावट कागदपत्राच्या आधारावर तलाठी पांडुरंग हाके यांनी व्यंकट बाबूराव बेलकर यांची जमीन पवन बेलकर यांच्या नावे करुन फसवणूक केली. या प्रकरणी संबधीतावर योग्य ती कारवाई करुन केलेला फेरफार रद्द करण्याची मागणी अन्यायग्रस्त शेतकरी मागच्या एक वर्षापासून तहसीलदार नायगाव यांचेकडे करत आहेत. परंतु तहसीलदारांनी मात्र या वादग्रस्त तलाठ्याला पाठीशी घालण्याचीच भुमिका घेतल्याने या बोगसगिरीला यांचाही पाठींबा नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
नायगाव तालुक्यातील रई (खु.) येथील तलाठी पांडुरंग हाके यांनी शेतकरी व्यंकट बेलकर यांची कोणतीच परवानगी न घेता गट क्रमांक १०६ मध्ये १ हेक्टर ६२ आर जमीन पवन बेलकर यांच्या नावे करुन व्यंकट बेलकर यांची फसवणूक केली. याप्रकरणी बेलकर यांनी मागच्या एक वर्षांपासून तहसीलदारांना तक्रारी करत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने केलेला फेरफार रद्द करण्याची मागणी करत आहेत.
त्याचबरोबर तलाठी हाके यांच्याकडेही पाठपुरावा करतच होते. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारे हाके यांनी आश्वासन देवून झालेली चुक दुरुस्ती करण्याचे लेखी पत्र दिले व एक महिण्यात केलेला फेरफार रद्द करण्याचेही लेखी दि. ३० मे २०२४ रोजी दिले होते.
लेखी पत्र देवूनही फेरफार रद्द करण्यास टाळाटाळ करण्यात येत असताना या वादग्रस्त तलाठ्याला पाठीशी घालण्याचे काम तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड या करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वैतागलेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्याकडे फौजदारी कारवाई करण्याची मागणी केल्याने या वादग्रस्त तलाठ्याचे कारनामे समोर येत आहेत.
तलाठी संघटनेचा अध्यक्ष असल्याने तो मुख्यालयी तर राहतच नाही पण अवैध वाळू व अवैध मुरुमाचे इउत्खनन व वाहतूक करणाऱ्यांनाही त्यांचे प्रोत्साहन असते. तलाठी संघटनेचा अध्यक्ष असल्याने तहसीलदार गायकवाड यांनीही दबावाखाली येवून हाके यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवत नसल्याने मुजोरी वाढत आहे.
तहसीलदारांनी या फेरफार प्रकरणाची दखल घेतली नसल्याने या प्रकरणाचा वाद बिलोली उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात गेला असून तेथे या प्रकरणी कधी निर्णय होणार याची प्रतिक्षा आहे.