नायगाव व नरसीमध्ये गुंडाराज वाढले : दोन दिवसातील दोन घटनेमुळे भितीचे वातावरण

लखपत्रेवार प्रभाकर
नायगाव : नायगाव व नरसीमध्ये गुंडाराज वाढत असून वाढत असलेल्या या गुंडाराजला आवर घालण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत आहे. त्यामुळे राजकीय आणि शैक्षणिक महत्व असलेल्या दोन गावातील शांतता भंग होत आहे. वाढत चाललेल्या गुन्हेगारीला नायगाव व रामतीर्थ पोलीस ठाण्याचे निष्क्रिय ठाणेदारावर जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
नायगाव शहर है शैक्षणिक द्रष्ट्या महत्त्वाचे शहर आहे तर नायगाव पासून अवघ्या चार किलोमीटरवर अंतरावर असलेले नरसी हे चौरस्ता आहे. मात्र या ठिकाणी दररोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद होत आहेत. नरसी व नायगावमध्ये दोन दिवसात हाणामारीच्या दोन घटना घडल्याने वातावरण गढूळ बनले आहे.
विशेषतः नरसी पोलीस चौकीत तर दररोज गर्दी दिसून येते कारण नरसी परिसरातील गुन्हेगारावर कुणाचाच वचक राहीला नसल्याने कुणीही उठसुठ पोलीस चौकीत येवून पोलीसांशी हुज्जत घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा लोकावर जरब बसवण्याऐवजी त्यांना गोंजारण्याचे काम होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांना गोंजारण्याचे काम होत असल्याने अशा लोकांचे मनोधैर्य उंचावत आहे.
अशाच प्रकरणातून नरसी येथे दि.24 मार्च रोजी अर्जुन बालाजी मेटकर या तरुणाला लग्नाचे बँनर लावण्याच्या कारणावरून मारहाण करण्याची घटना घडली यात त्या तरुणाला गंभीर दुखापत झाली असल्याने शेख आहेमद, जुनैद बागवान, लोकमान पठाण, रहेमान शेख,पुरखान पठाण व मुजीब शेख अदिंच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाल्याची घटना ताजी असतांनाच नरसीच्या काही टारगटांनी नायगाव शहरात येवून दि. 26 मार्च रोजी सायंकाळी येवून गोंधळ घातला.
याबाबत असे की, नशेत असलेल्या नरसीच्या काही तरुणांनी बुधवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान नायगाव येथील शेळगाव रोडवर पृथ्वीराज परमेश्वर बारडे (11) या शाळकरी मुलाला मोटारसायकलची धडक देवून जखमी केले. जखमी मुलाला बाजूला घेवून दत्ताहरी रावजी सुर्यवंशी याने पाणी पाजवत होते तर लोकडोजी सुर्यवंशी व गोविंद सुर्यवंशी यांनी त्याची विचारपूस करत असताना धडक दिलेले तरुण तुळशीराम उर्फ चिंटू सुरेश आळंदे, राजेश रामराव खनपटे, श्रीकांत काशीनाथ कुढणे हे तिघेही नरसी येथील रहिवासी असलेले परत आले पाणी पाजणाऱ्यांना व विचारपूस करणाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
याची माहिती नायगाव पोलिसांना समजताच बिट जमादार सांगवीकर यांनी घटनास्थळी जावून अगोदर एका आरोपीला ताब्यात घेतले तर दुसऱ्या दोघांना नंतर ताब्यात घेतले. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर अंकुश श्रीराम खनपटे हा ठाण्यात येवून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला यालाही ताब्यात घेतले त्यानंतर तसेच याच प्रकरणातील बालाजी लिंगू बाबुळकर यालाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला.
रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावर घडलेल्या या थरारक घटनेमुळे सायंकाळी नायगाव शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते तर काहींनी थेट पोलीस अधिक्षकांना फोन केला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष वेधल्यामुळे नायगाव पोलिसांनी या आरोपींची चांगलीच धुलाई तर केलीच पण एम एच 26/बी जम 6024 व एम एच 26/ सी जी 0643 या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
रामतीर्थ व नायगाव सारख्या पोलीस ठाण्यांना गुन्हेगारीवर आळा घालणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे पण हे दोन्ही अधिकारी गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी अपयश ठरत आहेत हे विशेष.