लाडक्या बहिणीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच बोलले : परिस्थिती सुधारल्यानंतरच 2100 चा निर्णय

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : विरोधक काहीही म्हणत असले तरी लाडकी बहीण योजना बंद करायची नाही. पण राज्याची अर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच 2100 रुपये देण्याचा निर्णय घेवू असे स्पष्टपणे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे नजिकच्या काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहिण योजना जाहीर करुन महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यचा धाडसी निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी सुरु केली. सुरुवातीला या निर्णयाचा विरोधी पक्षांनी विरोध करण्याबरोबरच सरकार टिकेची झोड उठवली होती परंतु विरोधकांनी आमचे सरकार सत्तेत आल्यास तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते तर महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केले.
सत्तेत आल्यानंतर देत असलेल्या 1500 रुपयासाठीच इतर विभागाचा निधी या योजनेत वळवावा लागला. याबाबत मंत्रीमंडळातच कुजबुज सुरु झाली तर दुसरीकडे राज्यातील महिला या सरकार 2100 रुपये कधी देते याची वाट पाहत होते. रविवारी पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने नायगाव तालुक्यातील नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले होते. त्यांना महिलांनी 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न विचारला असता मी राज्याचा उपमुख्यमंत्री तर आहेच पण अर्थमंत्रीही आहे.
त्यामुळे सध्या राज्याची काय परिस्थिती आहे हे मला माहिती आहे. कुटुंब चालवताना किती कसरत करावी लागते तसेच राज्यातील 13 कोटी जनतेचा मला विचार करावा लागतो आणि कुणाला काय द्यायचे याचाही. त्यामुळे राज्याची परिस्थिती सुधारल्यानंतरच 2100 रुपये देण्याचा निर्णय होईल अषे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे नजिकच्या काळात 2100 रुपये मिळण्याची शक्यता नसल्याचे दिसून येते.