रातोळीच्या तत्कालीन सरपंच ग्रामसेवकावर नायगांव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील रातोळी येथील तत्कालीन महिला सरपंच सौ. सुमनबाई पिराजी देशमुख व वादग्रस्त ग्रामसेवक सुधाकर वडजे यांनी संगणमताने १४ लाख ६७ हजाराचा अपहार केला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून दि. १४ जुन रोजी उशिरा नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते शेख जाकेर अर्धापूरकर यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
सदरील गुन्हा बाबत अधिक ची माहिती अशी की दिनांक 26.07.2021 ते दिनांक 06.09.2021 दरम्यान कार्यकाळात रातोळी ग्राम पंचायत येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक एस .जी . वडजे आणि सरपंच सुमनबाई पिराजी देशमुख यांनी संगणमत करून ग्रामपंचायत अंतर्गत 15 व्या वित्त आयोग मधील रकमेतून पाणीपुरवठा नळ जोडणी, आपले सरकार सेवा केंद्र, कच्चा रस्ता, नाली दुरूस्ती, सी.सी. नाली बांधकाम व दुरूस्ती काम, सीसी रोडकाम, शाळा दुरूस्ती, कॅम्पुटर दुरूस्ती आदी कामे करण्यासाठी म्हणून शासनाकडून आलेला निधी कामे न करता कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखत खोटे कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवून आरोपीतांनी संयुक्त स्वाक्षरी व डिजीटल स्वाक्षरी करून दोघांच्या संगनमताने गैरव्यवहार केला आणि शासनाची 14,6,587/- रूपयाची फसवणुक करीत रक्कम हडप केली.
या प्रकरणी शेख जाकीर शेख सगीर, वय 34 वर्षे, व्यवसाय (नगरसेवक न.प.अर्धापूर) तसेच संस्थापक अध्यक्ष, जनहित माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य रा.बरकतपूरा ता.अर्धापूर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे नायगांव येथे गुरनं.124/ 2025 कलम 420, 465, 46, 468, 471, 474, 406, 409, 34,120 (ब) भादवि कायदा प्रमाणे दिनांक 14 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री तोटावार हे करीत आहेत.