बिलोलीत कारवाई शून्य, नायगावात मात्र धाड : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या हेतूबद्दल शंका

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : अवैध धंदे कुठलेही असो त्यावर कारवाई झालीच पाहिजे ! पण कारवाई करतांना मात्र जाणीवपूर्वक दुजाभाव होता कामा नये. बिलोली तालुक्यातील तिनही वाळू घाटातून नियम धाब्यावर बसवून आणि निसर्गाचा प्रचंड ह्रास करुन वाळूचे उत्खनन होत असताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकदाही कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. दुसरीकडे नायगाव तालुक्यात इज्जतगाव येथे कारवाई करतांना यादीतील हायवा सोडून रिकाम्या हायवा ठाण्यात लावल्या. त्यामुळे या कारवाईबद्दल मात्र उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
बिलोली व नायगाव तालुक्यात वाळू हा विषय खुप चर्चेचा झाला आहे. यातून मिळणाऱ्या उत्पनामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी सक्रिय झाले असून महसूल विभागापेक्षा पोलीस अधिकारी जास्त अग्रेसर झाले असून. बिलोली तालुक्यातील मांजरा नदीतून वारेमाप व राक्षसी पध्दतीने होणाऱ्या उत्खननाकडे दुर्लक्ष करुन नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथे गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपस्यावर झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. इज्जतगाव येथे भरलेला हायवा सोडून रिकाम्या हायवा ठाण्यात लावल्या तर पोलीसांच्या यादीत असलेली वाहणे सोडण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे.
बिलोली तालुक्यात वाळू माफियांना मोकळे रान मिळाल्याची चर्चा आहे. येथे कारवाई न करता पोलीस विभाग केवळ हप्ते जमा करण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे, बिलोलीतील वाळू माफियांवर कारवाई न करता बिलोलीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी शेजारील नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथील वाळू घाटावर धाड टाकली. बिलोली तालुक्यात वाळू माफिया बिनधास्तपणे वाळू उपसा करत असून, स्थानिक पोलीस विभागाकडून आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
बिलोलीतील अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या तालुक्यात जाऊन अर्धवट कारवाई केल्याने पोलिसांच्या हेतूबद्दल संशय निर्माण झाला आहे. बिलोली तालुक्यात दिवसाढवळ्या अवैध वाळू वाहतूक सुरूविशेष म्हणजे ओव्हरलोड वाहतूक सुरु असूनही पोलीस मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.



