वाई बाजार ‘मनरेगा’ अपहार प्रकरणात न्यायालयात तक्रार ; राजकीय दबावामुळे लागले होते कारवाईला ‘ब्रेक’!
सरपंच, उपसरपंच सह उपसरपंच कुटुंबातील सहा जणाविरुद्ध आरोप

New Bharat Times नेटवर्क
माहूर : तालुक्यातील वाई बाजार येथील मनरेगा अपहार प्रकरणात जिल्हा परिषदेने दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फी,ग्रामसेवकांचे निलंबन आणि लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच घडामोडींनी नाट्यमय वळण घेतले होते, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी अचानक स्वतःचे च आदेश रद्दबातल ठरविल्या मुळे तक्रारदार साजिद खान यांनी मनरेगा भ्रष्टाचार प्रकरणातील एकूण 25 जणांविरुद्ध न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
यामध्ये वाई बाजारच्या विद्यमान सरपंच, उपसरपंच सह उपसरपंचाच्या कुटुंबातील सहा लाभार्थ्यांचा समावेश आहे.यामुळे राजकीय दबावाखाली थांबविण्यात कारवाई आता न्यायालयापर्यंत पोहोचली असून निश्चितच यामध्ये सर्व संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल होणार असल्याचा विश्वास तक्रारदार साजिद खान यांनी व्यक्त केला आहे.
वाई बाजार येथील रोहयो कामांतील मोठ्या गैरव्यवहारांच्या तक्रारीनंतर हदगावचे गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती. तब्बल १५ महिने विलंबानंतर हा अहवाल २२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेला सादर झाला. अहवालात शेततळे, वृक्ष लागवड, संगोपन,सिंचन विहीर, गोठे या अनेक कामांमध्ये प्रचंड अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
कामे कागदावर दाखवून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे निष्कर्ष चौकशीत नोंदविण्यात आले. 24 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले आणि माहूर पंचायत समितीतील आठ कर्मचारी बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. लाभार्थ्यांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले,परंतु अचानक कारवाईला ब्रेक लागल्यामुळे सदर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन कारवाई थांबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
चौकशी समितीच्या अहवालात जवळपास 17 लाख रुपये निधीचा अपहार झाल्याची बाब नमूद आहे.अशात एकूण 23 कामांपैकी सर्वाधिक कामे वाई ग्रामपंचायतचे उपसरपंच उस्मान खान यांच्या कुटुंबात त्यांचे मुलं, सुना व नातवंडांच्या नावे करण्यात आली होती. बनावट सातबारा आधारे लाटण्यात आल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला असून केवळ कागदावर कामे दाखवून शासन निधीचा अपहार करण्यात आलेला आहे.असे हदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा चौकशी समिती प्रमुख यांच्या अहवालात नमूद आहे.
◼️मनरेगा अपहार प्रकरणात एकूण 25 आरोपी…
वाई बाजार ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अपहार प्रकरणी माहूर न्यायालयात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये वाई ग्रामपंचायतचे सरपंच सिताराम मडावी यांच्यासह उपसरपंच हाजी उस्मान खान व तसेच त्यांच्या कुटुंबातील फिरोज खान उस्मान खान, कादर खान उस्मान खान, फैजल खान फिरोज खान, अमन खान फिरोज खान, सलमा फिरोज खान, सादिया कौसर कादर खान यांच्यासह सहा ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक,दहा तांत्रिक सहाय्यक व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती तक्रारदार साजिद खान यांनी दिली आहे.



