रातोळीत चोरट्यांचा धुमाकूळ : विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच लाखाची धाडसी चोरी मात्र पोलिसांनी दाखवली रक्कम कमी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील रातोळी येथे सोमवारी रात्री उशिरा चोरट्यांनी धुमाकूळ घालत विठ्ठल रुक्मिणीचे एक किलो चांदीच्या टोपासह पाच लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मात्र या चोरीचे महत्त्व कमी करण्यासाठी दागिण्याचे मुल्य कमी दाखवण्याचा प्रकार नायगाव पोलिसांनी केला आहे. नायगाव पोलीसांच्या या कारणाम्यामुळे सर्वत्र टिकेची झोड उठली आहे.

नायगाव पोलीस ठाण्याच्या निष्क्रिय अधिकाऱ्यामुळे ठाण्यात कुणाचा पायपोस कुणाला तर राहीला नाहीच पण वरचेवर गुन्हेगारीत वाढ होत असल्याने नागरिकात नाराजी वाढली असून नायगाव पोलीस ठाण्याला सक्षम पोलीस अधिकाऱ्याची गरज निर्माण झाली आहे. झालेल्या चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असून.सोमवारी रात्री उशिरा नायगाव तालुक्यातील रातोळी येथील विठ्ठल मंदिरात चोरट्यांनी हात मारला आहे. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून विठ्ठल रुक्मिणीचे एक किलो चांदीचे टोप, चार ग्रामचे मणी मंगळसूत्र आणि दानपेटी फोडून आतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

सदरच्या चोरुची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. गावातील नागरिकांनी नायगाव पोलिसांना कळवली. चोरीच्या घटनेची माहिती समजताच बिट जमादार बालाजी शिंदे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने श्वान पथक व ठसे तज्ञही आले. श्वान पथकाने माहेगाव रोडपर्यत माग काढला पण तेथे घुटमळत राहीला. चोरटे माहेगाव रोडवरून वाहणाने गेले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला तर ठसे तज्ञांनी चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तुंचे ठसे घेवून गेले आहेत. या चोरीच्या घटनेनंतर रातोळीमध्ये भितीचे वातावरण पसरले असून रातोळी परिसरात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.



