भावाच्या निधनानंतर आधार गमावलेल्या भावजयीशी लग्न व दोन मुलांचाही केला स्विकार

New Bharat Times नेटवर्क
किनवट : भावाच्या निधनानंतर आधार गमवलेल्या भावजयीला आणि दोन मुलांना आधार देण्याचे काम लहान भावाने केले असून. चक्क भावाच्या दोन्ही मुलांना स्विकारत विधवा भावजयीसोबत दि. 22 रोजी विवाह करुन समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केल्याची घटना किनवट तालुक्यातील वझरा (बु.) येथे घडली. पाटील कुटुंबाने कठीण प्रसंगात घेतलेला धाडसी आणि माणुसकीचा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

किनवट तालुक्यातील वझरा (बु.) स्व. अष्टपाल श्रीरंग पाटील याना विवाहानंतर एक मुलगा व एक मुलगी झाली व यांचा संसार सुरळीत चालू असताना अचानक आलेल्या आजाराने त्यांचे निधन झाले असल्याने या दुःखद प्रसंगामुळे कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला होता. अशा वेळी त्यांचा अविवाहित लहान भाऊ प्रफुल पाटिल यांनी पुढाकार घेत, आपल्या पुतण्या व पुतणीच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली व त्यांनी भावजय विजयालक्ष्मी यांच्यासोबत विवाह करून त्या कुटुंबाला आधार देण्याचा मोठा आणि धाडसी निर्णय घेतला.
त्यांनी ही माहिती गावातील व समाजातील प्रतिष्ठित वेक्तीना सांगितली असता त्यांनी हा निर्णय चांगला असून समाजाच्या रीती रिवाजाप्रमाणे विवाह करण्याचा सल्ला दिला. गावातील तरुण मंडळी सह गावकऱ्यांनी दि. २२ रोज रविवारी त्यांचा विवाह रीतिरिवाज प्रमाणे पार पाडला आहे. यावेळी वझरा (बु) येथील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा निर्णय केवळ वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित नसून कुटुंबप्रेम, कर्तव्यभावना आणि सामाजिक बांधिलकी यांचे जिवंत उदाहरण मानले जात आहे.
या कृतीमुळे संबंधित कुटुंबाला नवसंजीवनी मिळाली असून गावकऱ्यांकडूनही या निर्णयाचे कौतुक होत आहे.



