चोरीच्या वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवाने विजेच्या लोखंडी पोलला दिली धडक : MSEB चे अर्थिक नुकसान

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मारताळा भागातून चोरीच्या वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवाने मुखेडकडे जातांना कोलंबी येथे चक्क विजेचा लोखंडी पोलला धडक दिली. यात धडक दिलेला पोल तर चक्क वाकडा तिकडा झालाच आहे परंतु इतर तीन चार पोल कोलमडले आहेत. यामुळे विज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे मात्र सदर प्रकरणी कारवाई करण्याऐवजी अर्थिक तडजोडी करुन हायवा सोडून देण्यात आल्याची घटना दि. ५ मे रोजी रात्री घडली आहे.

लोहा तहसीलदार रेती माफीयांच्या ताटाखालचे मांजर बनले असल्याने लोहा व मुखेड तालुक्यातील रेती माफीयांनी नायगाव तालुक्यामध्ये प्रचंड उच्छाद मांडला आहे. महसूल विभागाने रात्रीला येणारी अवैध रेतीची वाहणे पकडण्याऐवजी ती सोडून देण्याचे धोरण अवलंबले असून. नायगाव तालुक्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नसतांना दररोज शहरासह ग्रामीण भागात असंख्य रेतीच्या हायवा येत असून नदीपात्रातून उपसा केलेली रेती विक्री करत आहेत.

लोहा येथील तहसीलदार हे रेती माफीयांना पुरक भुमिका घेत असल्याने त्या भागातून रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. लोहा तालुक्यातून चोरीच्या मार्गाने उपसा केलेल्या रेतीची रात्रीला अवैध वाहतूक करुन विक्री करण्यात येत आहे. विशेषतः लोहा तालुक्यातून चोरीची रेती नायगाव व मुखेड तालुक्यात विक्री करणारे मारताळा येथे रेती माफीयांचे एक रँकेट असून येथील स्थानिक दलालांच्या माध्यमातून नायगाव शहरासह मुखेड ग्रामीण भागात ग्राहक शोधून देत आहेत.
लोहा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून चोरीच्या वाळूचा हायव दि. ५ मे रोजी रात्री कोलंबी मार्गे मुखेडकडे जात होता. मात्र सदरच्या हायवाने कोलंबी येथे रोडच्या बाजूला असलेल्या विजेच्या लोखंडी पोलला जोराची धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की लोखंडी पोल अक्षरशः वेडा वाकडा होवून हायवावर पडला तर इतर तीन चार लोखंडी पोल कोलमडून पडले. नशीब बलवत्तर असल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही पण विज वितरण कंपनीचे यामुळे मोठे अर्थिक नुकसान झाले.
सदरची घटना घडल्यानंतर नायगाव ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सदरचा प्रकार अतिशय गंभीर असल्यामुळे चोरीच्या वाळूची अवैध वाहतूक करुन उलट शासनाचे नुकसान केल्या प्रकरणी हायवा चालक व मालकावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची गरज असताना केवळ अर्थिक तडजोडी करुन वाहणे सोडून देण्यात आली. एवढ्या गंभीर प्रकरणात कारवाई करण्यासाठी कुणीही गांभीर्य दाखवले नसल्याने सर्वच अधिकारी वाळू माफीयांच्या ताटाखालचे मांजर झाले असल्याची जोरदार चर्चा होत आहे